घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकी माथेफिरूने पेटवून दिल्या; दोन्ही दुचाकी जळून खाक ..!





शहरातील शिवाजी नगरमध्ये एका अज्ञात माथेफिरूने हातमजुरी करणार्‍या तरुणाच्या दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगरातील लाकूड पेठमधील गल्ली नंबर २ मधील रहिवासी चंदन विलास पाटील हा तरुण हातमजुरी करून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. त्या तरुणाने सदाकेश घनश्याम लखवाणी (रा. सिंधी कॉलनी) यांच्याकडून पाच सहा महिन्यांपूर्वी (एमएच १९ एवाय ६०९० व एमएच १९ डीई ३४८१ ) दोन दुचाकी विकत घेतल्या होत्या. त्या दुचाकी अद्याप त्याच्या नावावर झालेल्या नाहीत. त्या दुचाकींचा वापर चंदन व त्याचा भाऊ सागर हा कामावर जाण्या येण्यासाठी करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री त्यांनी आपल्या दोन्ही दुचाकी घरासमोर लावल्या होत्या. त्यानंतर जेवण करून ते झोपून गेले. बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात माथेफिरुने त्यांच्या दुचाकी पेटवून दिल्या.

घराबाहेरून अचानक जळण्याचा वास येत असल्याने चंदन याने घराबाहेर येऊन बघितले असता, त्याला आपल्या दोन्ही दुचाकी जळताना दिसून आल्या. त्यांनी तात्काळ पाणी टाकून जळत असलेल्या दुचाकी विझविल्या. याप्रकरणी चंदन पाटील याने दिलेल्या तक्रारीवरून ४० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी जाळल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय झाल्टे हे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या