राज्यभरात धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नाशिकमध्ये मात्र एक दुर्दैवी घटना घडली आहे. शहरात आज धुलीवंदनाच्या सणाला गालबोट लागलं असून धरणावर धुळवड साजरी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाशिकच्या कश्यपी धरणावर ही दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कश्यपी धरणावर नाशिक रोड भागातील दोन महिला आणि दोन पुरुष धुळवड साजरी करण्यासाठी गेले होते. यावेळी शिल्पा राजेश दिवेकर ही महिला पाय घसरून धरणात पडली. यावेळी शिल्पा यांच्यासोबत धरणावर गेलेल्या अन्य तिघांनी आरोडा-ओरड सुरू केली. त्यानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तब्बल २ तासानंतर या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. धुलीवंदनाच्या सणादिवशीच घडलेल्या या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या