प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
भारतीय संविधानाच्या कलम 330 प्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांना संसदेमध्ये तर कलम 332 प्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांना विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, असे म्हटले आहे. परंतु केवळ लोकसंख्येने ज्यादा आहे, खिशात पैसा आहे म्हणून महाराष्ट्रातील लिंगायत आणि धनगर समाज या दोन जातींनी दलितांच्या फक्त राजकीयच नव्हे, तर शिक्षण आणि नोकरी विषयक अधिकारावर तसेच संविधानिक अधिकारावर ही दरोडा टाकण्याची तयारी करीत आहेत. माळशिरस मधील उत्तम जानकर यांनी तर 2007 पासून या दरोडेची तयारी सुरू केली असून, मोठ्या चलाखीने दलितांचे आरक्षण हडप करण्याचे कट कारस्थान रचले. आपल्या मुलाबाळांना उच्च अधिकारी बनवण्याच्या दृष्टीने OBC आणि NT - C मधून शक्य नाही म्हटल्यानंतर, अनुसूचित जमाती (ST) या प्रवर्गातून जात प्रमाणपत्र मिळवण्याचा पर्याय ते शोधत होते. गरीब - कष्टकरी धनगर समाजाचे नाव घेऊन आणि त्यांचे चेहरे समोर करून आपल्या भोळ्या भाबड्या धनगर समाजालाही फसवण्याचा डाव उत्तम जानकर करीत होता. "धनगर आणि धनगड"शब्दांचा आधार घेऊन आम्ही अनुसूचित जमाती मधील आहोत आणि आम्हाला तसे प्रमाणपत्र द्या, म्हणून त्यांनी जातसंख्येच्या आणि धनसंख्येच्या बळावर मोठी लढाई उभी केली होती. मुळात OBC समाजा मध्ये समाविष्ट असणाऱ्या या धनगर समाजाच्या नेत्यांनी "आम्ही मेंढरं घेऊन फिरतो म्हणून आम्ही भटके" आहोत, असे म्हणून त्यांनी भटक्या विमुक्तांच्या यादीत 25/05/ 1990 मध्ये प्रवेश मिळवला. भटक्या विमुक्तांच्या यादीमध्ये अ ब क ड करण्यात आले आणि त्यामध्ये NT - C या गटात त्यांनी स्वतःला समाविष्ट करून 3.5% जागा मिळवल्या. स्वतंत्र साडेतीन टक्के जागा म्हणजे जोक नाही. पैसा, जात संख्या आणि जात ऐक्य या ताकदीवर त्यांनी हे मिळवले. शरद पवार हेच त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, हा योगायोग ही असू शकेल.
धनगर NT - C मध्ये आले आणि धनगर समाजातील मुलांना शिक्षण आणि उच्च पदांमध्ये मोठी संधी मिळाली. सर्वत्र त्यांचे अधिकारी दिसू लागले. पण त्यांची आदिवासी जमातीमध्ये घुसण्याची आणि आदिवासींचे शैक्षणिक आणि राजकीय हक्क हडप करण्याची लालसा कमी झाली नाही. "धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (ST) घाला" म्हणून त्यांची राज्यकर्त्यांवर दबाव आणणारी प्रचंड जात आंदोलने राज्यभर सुरू होती. राज्यातल्या आणि देशातल्या बड्या नेत्यांना बोलवायचे आणि त्यांच्या "गळ्यात घोंगडं आणि हातात काठी" द्यायची. याच काठीने अनुसूचित जमातींना शांत बसवा आणि त्या यादीत आम्हाला समाविष्ट करा, असा आग्रह धरायचा, अशी ही चाल होती.
पिवळे झेंडे, पिवळा भंडारा ते घोंगड - काठी आणि प्रचंड समुदाय बघून कोणत्याही राजकीय पक्षाचा पुढारी धनगर समाजाच्या गळ्यातच पडायचा.
ओबीसी ते एनटी - सी.... धनगर समाजाच्या या प्रवासाबद्दल कोणाला फारसे काही वाटले नाही, परंतु त्यानंतर त्यांच्या अपेक्षा वाढत गेल्या. धनगर समाजातील नेते डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये राहणाऱ्या उघड्या नागड्या आदिवासी जमातींच्या न्याय हक्कावरच घाला घालण्याची तयारी करत होते. त्यामुळे फुले - आंबेडकरी चळवळीमध्ये एक प्रकारची नाराजी होती. पण कुणी व्यक्त होत नव्हते. धनगर समाजाकडून जातसंख्येच्या बळावर आक्रमकपणे अनुसूचित जमातीमध्ये घुसण्याचा जो प्रयोग सुरू होता, त्याला महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जमाती मधील सामाजिक - राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन विरोध केला. त्यानंतर, धनगर समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये घुसण्याचा प्रयत्न तूर्तास तरी काही प्रमाणात थांबला आहे.
धनगर समाजातील काही "जाणकार" मंडळींनी मात्र ओळखले होते की, अनुसूचित जमाती ( ST ) मधून धनगर समाजाला आरक्षण मिळणे कठीण आहे. म्हणून त्यांनी अगदी गुपचूपपणे आपला मोर्चा अनुसूचीत जातींच्या ( SC )आरक्षणाकडे वळविला. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील संपूर्ण यादीचा अभ्यास करण्यात आला. त्यातील क्रमांक ९ च्या "हिंदू - खाटीक" जातीचा आधार घेण्याचा कट रचण्यात आला. या अघोरी कारस्थानामध्ये उत्तम जानकर आघाडीवर होते. आपल्या मुलांच्या शिक्षण व नोकरी मधील करिअर साठी 2007 सालापासून त्यांनी आपले "हिंदू - खाटीक" हे मिशन सुरू केले होते. त्यामध्ये राजकीय उद्देश ही होताच हे सांगण्याची आवश्यकता नाही.
योगायोगाने, 2009 साली माळशिरस मतदार संघ राखीव झाला. उत्तम जानकर यांच्यातील "राजकारणी व सरंजामदार" जागा झाला. वाटेल ते करून "आमदार" व्हायचं आहे. मग त्यासाठी वाटेल ते करून अनुसूचित जातीचे ( SC )प्रमाणपत्र काढायचे असा त्यांनी चंग बांधला. हिंदू खाटीक जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांनी "हिंदू - खाटीक" जात प्रमाणपत्र मिळविले. धनगराचा जानकर उत्तम पद्धतीने " खाटीक "झाला. आता त्याला मागासवर्गीय समाजाच्या म्हणजेच SC च्या आरक्षणाची कत्तल करायची होती. शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आणि राजकारणामध्ये खाटीक म्हणून अनुसूचित जातीच्या न्याय हक्कावर दरोडा टाकण्याची तयारी जानकरांनी सुरू केली होती.
2009 मध्ये माळशिरस मतदार संघातील सर्वेसर्वा विजयसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू मुंबई स्थित हनुमंत डोळस यांना माळशिरस मधून उमेदवारी दिली. डोळस विजयी झाले. त्यांनी जानकर यांचे प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात यश मिळविले. परंतु आपण हिंदू खाटीक आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न उत्तम जानकर करीतच होते. कारण त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. माळशिरस मतदारसंघ राखीव होता. जानकारांना आमदार तर व्हायचं होतं, त्यामुळे हिंदू खाटीक होण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. जानकर यांनी स्वतःबरोबरच आपली मुलगी ज्योती आणि मुलगा जीवन याचेही हिंदू खाटीक असे जात प्रमाणपत्र काढले. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे ज्योती उत्तम जानकर ही आळंदी नगरपालिकेमध्ये SC जागेवर निवडून आली. ती आळंदीमध्ये नगरसेविका झाली. परंतु इथेही विजयसिंह मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत डोळस याने अत्यंत डोळसपणे लक्ष घालून ज्योती जानकर हिचे नगरसेवक पद आणि तो जात प्रमाणपत्राचा बोगस दाखला रद्द करून घेतला. आपल्या मुलाला वकील करण्यासाठी उत्तम जानकर यांनी त्याला अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये घुसडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मुलाला शैक्षणिक आरक्षण आणि स्वतःसाठी आणि मुलीसाठी राजकीय आरक्षण अशा दोन्ही प्रकारच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न उत्तम जानकर शांतपणे करत होता.
उत्तम जानकरच्या धडपडीतून प्रेरणा घेऊन माळशिरस तालुक्यातील 36 धनगरांनी "हिंदू खाटीक" हे बोगस प्रमाणपत्र मिळविले. त्यामध्ये माळशिरस नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि पंचायत समितीचे माजी सभापती यांचाही समावेश आहे. आता जर ही जमीनदार आणि धनदांडगी धनगर जात अनुसूचित जातीचा लाभ घेण्याच्या स्पर्धेत उतरली तर मूळचे मांग, महार, ढोर, चांभार, होलार... अशा शेकडो वर्षापासून उपेक्षित असणाऱ्या जातींना शिक्षण, नोकरी आणि राजकारणामध्ये न्याय मिळेल काय ? हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतःची राक्षसी महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी उत्तम जानकर यांनी एससी (SC) प्रवर्गातील ५९ जातींवर जो अत्याचार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तो खरे तर थांबला पाहिजे. त्यांनी तो स्वतःहून थांबवला पाहिजे. परंतु जानकर त्या मनस्थितीत दिसत नाहीत. म्हणूनच आम्ही शरद पवारांना आवाहन केले की, अनुसूचित जातीमधील कोणत्याही माणसाला तुम्ही उमेदवारी द्या, पण लिंगायत आणि धनगर अशा प्रभावी जातींना बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर उमेदवारी देऊ नका. परंतु पवार साहेब सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. उत्तम जानकर यांना माळशिरस मधून आमदार व्हायचे आहे आणि शरद पवारांना पुन्हा एकदा वाटेल ते करून महाराष्ट्रात स्वतःची सत्ता आणायची आहे. त्यासाठी या दोघांनी संविधानाचीच हत्या करण्याचे ठरवले आहे.
गोरगरीब, दलित समाजाचा राजकीय बळी घेण्यासाठी, आपले सत्ताप्राप्तीचे अघोरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरद पवार ज्या वाटेवरून चालले आहेत, ती वाट शरद पवारांना बदनाम करणारी वाट ठरणार आहे. आम्ही आणि आमच्या पिढीने शरद पवार साहेबांवर मनापासून प्रेम केले आहे. आजही आमचे प्रेम आहे.. त्यामुळेच आम्ही कळकळीने सांगत अहोत की, पवार साहेब, दलित समाजाला फसवू नका. त्यांच्या न्याय हक्कावर गदा आणू नका. त्यांच्या स्वाभिमानाचा, प्रामाणिकपणाचा बळी घेऊ नका. जे त्यांच्या वाट्याचे आहे ते त्यांना राहू द्या. ज्याचे माप त्याच्या पदरात पडू द्या.
शेवटी ऐवढेच म्हणतो की, उत्तम जानकर हा मेंढरासारख्या निष्पाप असलेल्या दलित समाजाच्या कळपात घुसलेला लबाड लांडगा आहे, त्याला लोकशाहीच्या मार्गाने रोखावे लागेल. फुले - शाहू - लहूजी - अहिल्याबाई - आंबेडकर - अण्णाभाऊंच्या विचारांची ताकद दाखवून द्यावी लागेल. तेव्हा, संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे मी माळशिरससह महाराष्ट्रातील तमाम दलित समाजाला आणि पुरोगामी कार्यकर्त्यांना आवाहन करीत आहे.
प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे
संस्थापक अध्यक्ष - दलित महासंघ, महाराष्ट्र
बहुजन_समता_पार्टी..
0 टिप्पण्या